गुरुवार, २६ मार्च, २००९

हरवलेलं सुख

माझं गाव तसं शांत आहे. म्हणजे वर्दळीच्या वेळेतही बर्‍यापैकी मोकळे रस्ते असतात. आमच्या भागात तसा उन्हाळा जरा कडकच. मग दुपारच्या वेळेस उन्हाळ्यात रस्ते, गल्ल्या अगदी मोकळ्या मोकळ्या असतात. तुरळक चुकार एखादी रिक्षा धावते, किंवा कुल्फीवाला/बर्फ का गोलेवाला पुकारा करत जातांना दिसतो. दुपारी मात्रं उन चांगलेच तापलेले असते. शिशिरातली पानगळ धुळीच्या भोवर्‍यांवर स्वार होउन गल्लोगल्ली, छोट्या मोठ्या मैदानांवर नाचत असते. आईची नजर चुकुवुन बाहेर खेळणारे एखादे चिमुरडे त्या वावटळींमधे कागदाचे तुकडे टाकण्यात मग्न असते. एखादी टिक्कल (कागदाचा गोल तुकडा) वावटळीत अडकुन गोल गोल फिरुन भुर्रकन वर उडाली की त्याच्या आनंदाला पारावार रहात नाही.

गरम हवा (झळाया) सुटलेल्या असतात, झाडांची सळसळ अन तुरळक कुठुनतरी लांबुन येणार्‍या टीव्हीच्या हलक्याश्या आवाजात शांतता भरुन राहिलेली असते. अश्यावेळेस घराच्या दारांवर, खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावले जातात, त्यावर पाणी शिंपडुन त्यांच्या ओलेपणाची दुपारपुरती बेगमी केली जाते. घर सुरेख शीतल गार पडते, उन्हाच्या काहिलीने वैतागलेला जीव सुखावतो, सकाळची कामे करुन थकलेल्या आया-मावश्या जरा विसावतात. हलक्या आवाजात विविधभारती लावले जाते, हातातला पेपर अधुन मधुन वारा घेण्यासाठीही हलवला जातो. दुपारच्या जेवणात ताटात कुरडया पापड्या येतात तेव्हाच मनाला त्याची चाहुल लागलेली असते. राजासारखा तो मागावुनच येतो. केशरी पिवळसर घट्ट आमरसाने भरलेली वाटी. अगदी तुडुंब असे जेवण होते. नावापुरती शतपावली केली जाते अन वडिलधार्‍यांचे थोडे दुर्लक्ष झाले की सरळ गारेग्गार्र फरशीवर ताणुन दिली जाते. गाढ झोप लागते.

कपबश्यांच्या किणकिणाटाने झोप चाळवते. एव्हाना उन्हं उतरायला लागलेली असतात गल्लीतल्या पोरासोरांचा किलबिलाट सुरु झालेला असतो. चहाचा सुगंध घरात दरवळतो. गाढ झोपेने अंग अगदी जडावलेले असते, हलावे वाटत नाही. हौदातल्या थंड पाण्याने खसखसुन हात पाय तोंड धुतले जाते, अगदीच उकाडा असेल आणी वडिलधारे बाजुला कोणी नसेल तर पट्टकन बादलीभर पाणी डोक्यावर उपडे पण केले जाते. गात्रंन गात्र सुखावते. जडपणा कुठेल्या कुठे वाहुन जातो. "चल येउन बस इकडे, मी पुसते डोके तुझे !!" असे म्हणताच आज्जीच्या पायाशी बसले जाते. ती खसखसुन डोके पुसतांना वाफाळलेला चहा एकेक घोट करुन अंगात चैतन्य वहावत असतो.

उन्हं पुरती कलल्यावर झाडांना पाणी घालण्याचा कार्यक्रम ठरलेला. आधी मोठी झाडं, मग गच्चीवरच्या कुंड्या. दुपारच्या कडक उन्हात तापलेली माती पाणी पडताच मायेने ओथंबते, हलकासा मृदगंधही जाणवतो. छातीभरभरुन वास घेण्याचा प्रयत्न केला तरी मन भरत नाही. पाउसही लवकरच येणार आहे असे मनाला समजवले जाते, ते तात्पुरते. सगळी झाडं संपल्यावर गच्चीवर आणी अंगणात सडा टाकला जातो. भराभर पाणी सुकुन जाते. त्यांच संध्याकाळचं दुध पिउन झालं की उन्हं उतरल्यामुळे मुलांना बाहेर खेळायची परवानगी मिळते. रांगोळी शिकणार्‍या चिल्ल्यापिल्ल्या सडा टाकलेल्या स्वच्छ अंगणात हात आजमाउन घेतात अन मुले काहीबाही खेळ खेळतात. अगदी किलबिलाट चालु असतो !! टीण्ण टीण्ण अशी घंटी वाजवत एखादा मटका कुल्फी वाला आलेला असतो, परवाच तर खाल्ली होतेस ना अशी सबब मिळुन कुल्फीला नाही म्हणायचा मोठ्याकडुन प्रयत्न होतो पण बच्चे कंपनी ऐकत नाही, दोन वाली किंवा तीन वाली अशी करुन सगळ्यांसाठी एकेक कुल्फी घेतली जाते. कुल्फीवाला माठात हात घालुन अ‍ॅल्युमिनिअमच्या कुल्फी कॅन काढतो. वरचे रबरी बुच काढुन तित काडी खोचुन दोन्ही पंजांच्या मधे सरासर फिरवतो अन झटकन काढुन समोरच्या मुलाच्या हातात देतो, मुल चराचराला विसरलेले असते !!

सुर्य कलतो, तिन्हीसांजा होतात. कातरवेळेचं भान राहु नये म्हणुन देवापुढे दिवा लावला जातो, खेळणारी लहानगी शहाणी बनुन पर्वचा म्हणतात. सातच्या बातम्या सगळ्यांनी मिळुन पाहिल्या जातात. रात्रीची जेवणं झाली की गच्चीवर अंथरुणं टाकली जातात. चंद्रप्रकाशात मोठ्यांच्या गप्पांना अन मुलांच्या दंग्याला उत येतो. शेवटी त्यांना शांत बसवायला हवे म्हणुन आजोबा एखादी छानशी शिवरायांची गोष्ट सांगायला घेतात, चांदण्या बघत - कुतुहलाने गोष्ट ऐकत एकेक पोर शांत झोपी जाते. हळुहळु मोठी माणसं पण पाठ टेकवतात.

चंद्रप्रकाशात न्हायलेलं माझं गावही एव्हाना शांत झालेलं असतं, घर अन घर सुखाने निर्धास्त झोपी जाते.



या लेखाला मिसळपाव डॉट कॉम वर मिळालेले प्रतिसाद पहा.

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

hey dear,

after a long time visited to u r blog, i saw this in Misalpav.com .. nicely written keep it up the gud work,,

Reg, Mani

अनामित म्हणाले...

नमस्कार,
लेख छान आहे. उद्याच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
शेखर जोशी

अनामित म्हणाले...

मणी, मराठी ब्लॉगवर मराठीत प्रतिसाद देत जा. विशेषत: इंग्रही कच्चे असेल तर.

I saw this in misalapav? or on misalpav?

koustubh kulkarni म्हणाले...

tumhi comment kelyane mala purna lekh vachayala milala .. khooop sundar lekh ahe .. mi.pa. var fakta ek para takla hota ... purna pahilyandach vachala ..chan vatala ... dhanyavaad :)