गुरुवार, ३० एप्रिल, २००९

अंधार चांदण्यांचा

उत्तररात्रीनंतर किंवा पहाटेच्या आधी पोर्णिमेचा सुरेख गोलाकार चंद्र पश्चिम क्षितिजावर त्याचे अस्तित्व टिकवायला झगडत असावा.
आकाशाच्या छातीवर चित्रविचित्र आकार गोंदणारे गुढ तारकासमुह फिकट पडुन लुप्त होण्याची भिती बाळगुन असावेत, वाराही साफ पडलेला असावा. दिवसाला दिवस जोडणारा दुवा मी असाच उघड्या कोरड्या डोळ्यांनी संपवत आणलेला असावा. अन आता ते चंद्राचे पश्चिम क्षितिजावर बुडणे असह्य होत जावे...

उघड्या डोळ्यांनी सुरु व्हावा एक स्वप्नमयी भास .. कुठल्याश्या गर्द झाडीत बुडालेल्या दोन डोंगरांच्या दरीत असलेली नदी आणी तिच्या किनार्‍यावर कोरलेली लेणी. किनार्‍यावरच एका विविक्षित ठिकाणी जणु एखादी शापित अप्सराच दगडाची झाली असावी की काय इतपत सुंदर वाटणारी मुर्ती असावी. मी भारावल्यासारखा तिच्याकडे ओढला जावा, अधिरतेने तिला चुंबावा, अन फत्थरात यावी जान, मला जाणवेल न जाणवेल इतकी जाणिव होताच ती धुर बनुन वायुंडलात लुप्त व्हावी.

मी तिथेच तिला शोधत रहावा, तिथल्या निर्जिव खडकात धडका देत. भळाभळा रक्ताच्या धारा लागाव्यात, सगळीकडे होउन जावे लालच लाल .. भडक्क. धुवांधार पावसांच्या धारांनी ती दरी भरावी काठोकाठ अन लालेलाल. त्या लाल स्वप्नातुन जाग यावी कोरडी डोळ्यांनी. पुन्हा तोच बुडणारा चंद्र असावा डोळ्यासमोर अन फिकट चांदणे आकाशात पसरलेले..

चराचराला गिळुन टाकणारी खिन्नता जणु सगळ्या आसमंताला व्यापुन असावी. आपण वेड्यासारखी त्या तेजोनिधीची वाट पहावी. फिकट चांदण्यांना विझवुन बुडत्या चंद्राला बुडवुन लख्ख आसमंत प्रकाशमान होण्याची.
क्षणांना युगांची उपमा थिटी पडावी !
अस्वस्थ पणे निराशा घेरुन यावी अन सगळ्याच रात्रींना संपवणारा सुर्य नसतो असे काहीसे पटायला लागावे.

मज हे कसे उमगले
ते दु:स्वप्न नव्हते
मज चांदणे सुखाचे
केव्हा समीप नव्हते

मम भास होत राही
पुन्हा पुन्हा प्रभेचा
मम झुठ स्वप्न दावी
अंधार चांदण्यांचा

वेड्या पिश्या मनाला
आशा तशीच वेडी
उमजेल काय त्याला
हि काळरात्र आहे

गुरुवार, २६ मार्च, २००९

हरवलेलं सुख

माझं गाव तसं शांत आहे. म्हणजे वर्दळीच्या वेळेतही बर्‍यापैकी मोकळे रस्ते असतात. आमच्या भागात तसा उन्हाळा जरा कडकच. मग दुपारच्या वेळेस उन्हाळ्यात रस्ते, गल्ल्या अगदी मोकळ्या मोकळ्या असतात. तुरळक चुकार एखादी रिक्षा धावते, किंवा कुल्फीवाला/बर्फ का गोलेवाला पुकारा करत जातांना दिसतो. दुपारी मात्रं उन चांगलेच तापलेले असते. शिशिरातली पानगळ धुळीच्या भोवर्‍यांवर स्वार होउन गल्लोगल्ली, छोट्या मोठ्या मैदानांवर नाचत असते. आईची नजर चुकुवुन बाहेर खेळणारे एखादे चिमुरडे त्या वावटळींमधे कागदाचे तुकडे टाकण्यात मग्न असते. एखादी टिक्कल (कागदाचा गोल तुकडा) वावटळीत अडकुन गोल गोल फिरुन भुर्रकन वर उडाली की त्याच्या आनंदाला पारावार रहात नाही.

गरम हवा (झळाया) सुटलेल्या असतात, झाडांची सळसळ अन तुरळक कुठुनतरी लांबुन येणार्‍या टीव्हीच्या हलक्याश्या आवाजात शांतता भरुन राहिलेली असते. अश्यावेळेस घराच्या दारांवर, खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावले जातात, त्यावर पाणी शिंपडुन त्यांच्या ओलेपणाची दुपारपुरती बेगमी केली जाते. घर सुरेख शीतल गार पडते, उन्हाच्या काहिलीने वैतागलेला जीव सुखावतो, सकाळची कामे करुन थकलेल्या आया-मावश्या जरा विसावतात. हलक्या आवाजात विविधभारती लावले जाते, हातातला पेपर अधुन मधुन वारा घेण्यासाठीही हलवला जातो. दुपारच्या जेवणात ताटात कुरडया पापड्या येतात तेव्हाच मनाला त्याची चाहुल लागलेली असते. राजासारखा तो मागावुनच येतो. केशरी पिवळसर घट्ट आमरसाने भरलेली वाटी. अगदी तुडुंब असे जेवण होते. नावापुरती शतपावली केली जाते अन वडिलधार्‍यांचे थोडे दुर्लक्ष झाले की सरळ गारेग्गार्र फरशीवर ताणुन दिली जाते. गाढ झोप लागते.

कपबश्यांच्या किणकिणाटाने झोप चाळवते. एव्हाना उन्हं उतरायला लागलेली असतात गल्लीतल्या पोरासोरांचा किलबिलाट सुरु झालेला असतो. चहाचा सुगंध घरात दरवळतो. गाढ झोपेने अंग अगदी जडावलेले असते, हलावे वाटत नाही. हौदातल्या थंड पाण्याने खसखसुन हात पाय तोंड धुतले जाते, अगदीच उकाडा असेल आणी वडिलधारे बाजुला कोणी नसेल तर पट्टकन बादलीभर पाणी डोक्यावर उपडे पण केले जाते. गात्रंन गात्र सुखावते. जडपणा कुठेल्या कुठे वाहुन जातो. "चल येउन बस इकडे, मी पुसते डोके तुझे !!" असे म्हणताच आज्जीच्या पायाशी बसले जाते. ती खसखसुन डोके पुसतांना वाफाळलेला चहा एकेक घोट करुन अंगात चैतन्य वहावत असतो.

उन्हं पुरती कलल्यावर झाडांना पाणी घालण्याचा कार्यक्रम ठरलेला. आधी मोठी झाडं, मग गच्चीवरच्या कुंड्या. दुपारच्या कडक उन्हात तापलेली माती पाणी पडताच मायेने ओथंबते, हलकासा मृदगंधही जाणवतो. छातीभरभरुन वास घेण्याचा प्रयत्न केला तरी मन भरत नाही. पाउसही लवकरच येणार आहे असे मनाला समजवले जाते, ते तात्पुरते. सगळी झाडं संपल्यावर गच्चीवर आणी अंगणात सडा टाकला जातो. भराभर पाणी सुकुन जाते. त्यांच संध्याकाळचं दुध पिउन झालं की उन्हं उतरल्यामुळे मुलांना बाहेर खेळायची परवानगी मिळते. रांगोळी शिकणार्‍या चिल्ल्यापिल्ल्या सडा टाकलेल्या स्वच्छ अंगणात हात आजमाउन घेतात अन मुले काहीबाही खेळ खेळतात. अगदी किलबिलाट चालु असतो !! टीण्ण टीण्ण अशी घंटी वाजवत एखादा मटका कुल्फी वाला आलेला असतो, परवाच तर खाल्ली होतेस ना अशी सबब मिळुन कुल्फीला नाही म्हणायचा मोठ्याकडुन प्रयत्न होतो पण बच्चे कंपनी ऐकत नाही, दोन वाली किंवा तीन वाली अशी करुन सगळ्यांसाठी एकेक कुल्फी घेतली जाते. कुल्फीवाला माठात हात घालुन अ‍ॅल्युमिनिअमच्या कुल्फी कॅन काढतो. वरचे रबरी बुच काढुन तित काडी खोचुन दोन्ही पंजांच्या मधे सरासर फिरवतो अन झटकन काढुन समोरच्या मुलाच्या हातात देतो, मुल चराचराला विसरलेले असते !!

सुर्य कलतो, तिन्हीसांजा होतात. कातरवेळेचं भान राहु नये म्हणुन देवापुढे दिवा लावला जातो, खेळणारी लहानगी शहाणी बनुन पर्वचा म्हणतात. सातच्या बातम्या सगळ्यांनी मिळुन पाहिल्या जातात. रात्रीची जेवणं झाली की गच्चीवर अंथरुणं टाकली जातात. चंद्रप्रकाशात मोठ्यांच्या गप्पांना अन मुलांच्या दंग्याला उत येतो. शेवटी त्यांना शांत बसवायला हवे म्हणुन आजोबा एखादी छानशी शिवरायांची गोष्ट सांगायला घेतात, चांदण्या बघत - कुतुहलाने गोष्ट ऐकत एकेक पोर शांत झोपी जाते. हळुहळु मोठी माणसं पण पाठ टेकवतात.

चंद्रप्रकाशात न्हायलेलं माझं गावही एव्हाना शांत झालेलं असतं, घर अन घर सुखाने निर्धास्त झोपी जाते.



या लेखाला मिसळपाव डॉट कॉम वर मिळालेले प्रतिसाद पहा.

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

दुवा

आज अखेर तुझ्या न माझ्यातला अखेरचा दुवा पण निखळला. ते तोंडपाठ असलेले दहा आकडे. गायत्री मंत्रापेक्षा जास्त वेळा म्हटलेले. सकाळी एकमेकांना कॉल करुन उठवण्यापासुन ते गुड नाईटच्या एसेमेस पर्यंतचे तसेच रोजच्या सप्तरंगी प्रवासाचे सोबती ते दहा आकडे .. आज निखळले. एकतर्फी संपर्काचा शेवटचा पुल पण ढासळला. हे तुला पुन्हा गमावण्याइतकेच त्रासदायक, उखडुन टाकणारे.

नवा नंबर तुला कळवावा की नाही या विचारातच मला डोळा लागावा अन मी येउन पोहचावा स्वप्नांच्या धुसर निळसर आभासी जगात ! आता एरवी मला अप्राप्य अशी तु अगदी हाताच्या अंतरावर येउन पोहचावी. तुझ्या हातात असावी एक सुरेख शुभ्र हस्तिदंती लहानशी पेटी. तु त्या पेटीला माझ्याकडे पाहुन मला लक्षात येईल असे हृदयाशी कुरवाळावे अन कुतुहलाने मी दंग होत जावा. स्मृती जागी व्हावी अन आठवावा कुठल्यातरी दुकानात त्या पेटीसाठी तु केलेला हट्ट .. हो तीच ती ! माझ्या चेहर्‍यावर ओळखीचे स्मित उमटावे, तुलाही त्याच आठवणीची मला लागलेली ओळख पटुन तुही हर्षभरीत व्हावीस.

त्यात आता तु तुझा खाशा महत्वाचा एवज जपुन ठेवलेला असावा. वाळलेल्या फुलाची दांडी, तु अन मी एकत्र लावलेल्या पणतीतली अर्धवट जळालेली वात, कुठल्याश्या चॉकलेटची चमकी, टिचभर कागदाच्या चिठोर्‍यावर खरडुन लिहलेलं ३ ओळींच पहिलं पत्र, माझा कधीकाळचा शाळाकरी वयातला जुनाट पिवळा पडलेला ब्लॅक अन व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो अन असेच बरेच काही. कचरा म्हणुन सहज फेकवले जाणारे. आपल्यासाठीचा हळुवार, खोडकर तरी कधी टोचणार्‍या आठवणींचा खजिना ! त्या पेटीतला तो एवज पाहुन माझे मन आनंदाने उचंबळुन यावे.

आता हाच आपला संपर्क असे जणु तुला सुचवायचे असावे. तु अबोलच रहावीस अन अबोलच गुप्त व्हावीस त्या आठवणींचा खजिन्यासकट.

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !