शुक्रवार, १९ मार्च, २०१०

काहीबाही..

प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ?
तासनतास चालणारी भेट पण काही क्षणातच भुर्र झालीये असे वाटावे. कसली ती ओढ, काय तो वेडेपणा !! तासांमागुन तास, सकाळ नंतर दुपार अन शेवटी संध्याकाळ येतेच. सातच्या आत घरातला नियम वाकवुन नउच्या आत घरात झालेला. मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'. अनेक न सुटणार्‍या प्रश्नांवरचा उहापोह, खरेदीची प्लॅनिंग, आईबापांबरोबरची व्युहरचना आणी भारंभार स्वप्नांच्या ओझ्याखाली दबलेला दिवस कातरवेळेबरोबर दिनवाणा होत जातो. दुचाकीही जराशी संथ आणी मिठीही तशीच .. सैलसर. तिला शेवटी उतरायचे असतेच, दिशा-रस्ता आणी सोबत ठरवुन थोडेच होते. रस्ता वळतो दिशा बदलते आणि सोबत संपते. शाश्वत आणि चिरंतन एकटेपणाला कवेत घेउन खुराड्यात शिरायचे.

----------------------------------------------------------------------------------------

सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?

----------------------------------------------------------------------------------------

उद्या उठुन लचके तोडणार्‍या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?

----------------------------------------------------------------------------------------

तिच्या डोळ्यातली स्वप्नं, तिचा आनंद आणि तिच्या बेमालुम झाकलेल्या जखमा.
वेड्या कविता, रेहमानची गाणी आणि निलाजरे घड्याळ.
भरुन आलेले आभाळ, हलकासा मृदगंध आणि कर्कश्य डोअरबेल.
वळणारा रस्ता, बदललेली दिशा आणि संपलेली सोबत.

----------------------------------------------------------------------------------------