मंगळवार, १२ ऑगस्ट, २००८

अंकुर

अंधारलेल्या भल्या पहाटे आपल्या गावाने ओलेत्यानेच आपले स्वागत करावं. दाराशी पोचल्या पोचल्या पोचल्या तोच पारिजताकाचा शुभ्र सडा दारी अंथरलेला असावा. अंगणातलं झाडंन झाड ओळखीच हसावं. पावसानं ओलीचिंब ती, माझ्या अंगणातली झाडं, जणु अपार माया निथळत असावीत. घर आल्याची आश्वस्त जाणीव क्लांत मनाला निववुन जावी, इतक्यात सकाळची नांदी देणारी कोकिळेची 'कूहssकूहssss' अशी हाक आसमंतात घुमावी अन टप्पकन एक टपोरा गारेग्गार पाण्याचा थेंब अगदी अचुक कपाळावर पडावा. आशिर्वाद देणारा !



या अश्या निव्वळ सुखाला विषण्ण विलक्षण छेद देउन जाणारा अव्यक्त सल खस्स्कन काळजात रुतावा, सय दाटुन यावी, अन मग असेच बरेच काही, भळाभळा वहाणारे वहात रहावे, तिथेच उभ्या उभ्याच. मनात दाबुन ठेवलेली ती वेदना अशी जर्राशी फट मिळताच उसळुन बाहेर यावी, चुका शोधुन शोधुन आठवल्या जाव्यात, खपल्या उकरल्या जाव्यात. मग चालु रहावे द्वंद्व अशाच विचारांचे अन खोटारड्या वांझोट्या स्वप्नांचे. स्वागत करणारे हसरे घर आता हिरमुसले वाटायला लागते, त्याला आपला केवडा हवा असतो,त्यासाठी त्याचे आक्रंदन अन केवड्याच्या मनात काही वेगळेच. अशी का बरे दर आनंदाच्या क्षणाला तुझी आठवण यावी ? का जाणवावी हलकीशी थरथर ? का बरे व्हावा आवाज कातर ?



एव्हाना बरिचशी फुले मी ओंजळीत जमा केलेली असतात अन समोर सुहास्य वदनाने ती वात्सल्यमुर्ती उभी असते, आई ! तिच्या हातातल्या दुरडीत खुप सारी रंगेबीरंगी फुले असतात, काही फुलांना काटेही असतात अन काही मंजुळाही असतात. माझीही ओंजळ हलकेच त्या दुरडीत रिती होते, त्या फुलांमधे आता माझ्या ओंजळीतली फुलंही सामावलेली असतात. मी हलकेच तिच्या पायाशी वाकतो, डोक्यावरुन तिचा आश्वस्त हात फिरतो अन फुलाचा झाडाच्या दिशेने एक अनोखा प्रवास सुरु होतो. आकाशात तांबडे फुटलेले असते अन आताशाच रुजवलेल्या एका बीजालाही एक छोटा हिरवा अंकुर फुटलेला असतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: