शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११
काहीबाही.. (२)
------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन रामप्रहर आहे, पहाटच्या अंधारात जुईची फुले म्हणजे .. जणु रातभर आकाशी विहरुन क्लांत झालेल्या तारका जमीनीवर विश्रांतीला उतरलेल्या असाव्यात. मी एकेकीला कवेत घेण्याचा प्रयत्न करतो तसे त्यांचे अश्रू माझे हात ओले करतात. मी त्यांना पहाटचे दव असावे म्हणुन विसरण्याचा यत्नात भिजुन जातो.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भुरभुरते केस .. सुरावटींचे अविष्कार आणि गुलजार .
हसुन ती मला म्हणाली .. मी तुला आवडते का रे ? मी म्हणालो .. आवडते ?? तुझा सहवास म्हणजे काव्यानुभुती !!
तिला मी त्या दिवशी म्हटले आठवणी कधी चिरंतन असतात का ग ? मग मी का नेहमी तु समोर असतांना तुझ्या आठवणीत असतो ? शेवटी हा आठवणींचा अतार्किक आलेख गुंडाळुन मी तिला म्हटले,
कसे व्हावे जगणे अवघड
कश्या व्हाव्यात वाटा धुसर
कसा पडावा त्रैलोक्याचा विसर
आणि चालावा फक्त आठवणींचा जागर ..
रविवार, ४ एप्रिल, २०१०
हरवलेले सुख - वाढदिवस
"अजुन दोन महिने आहेत रे" ते "आता उद्याच आहे ना" असा उत्तराचा प्रवास पुर्ण करत वाढदिवस एकदाचा येतो. अवचित एखाद्या वर्षी शाळेला दांडी मारायची पण मुभा असायची, दांडी मारायची नसेल तर आख्ख्या वर्गभर चॉकलेटे वाटायची गंमत मिळणार असायची. आधीपासुनच बाबांच्या मागे लागायचे "बाबा यावेळेस गोळ्या नाही हं वाटायच्या, आपण चॉकलेट आणुयात ना वाटायला !". गोळ्या म्हणजे साध्या आणी चॉकलेट म्हणजे भारी ही समजुत अगदीच पक्की. वर्गात चॉकलेट वाटुन संपल्यावर लक्षात यायचे की आपल्यासाठी चॉकलेट काही उरलेच नाहीये, रडवेला चेहरा पाहुन बाईंच्या ते लक्षात यायचेच, मग बाईंच्या वाट्याला आलेले चॉकलेट त्या लगोलग देउन टाकायच्या, नमस्कार केल्यावर पाठीवर हात फिरवायच्या. शाळा कधी परकी वाटलीच नाही.
परगावी कॉलेजात शिकणार्या ताईला स्वतःच्या हाताने लिहुन पत्र टाकलेले, पत्रोत्तर येणार की ताई येणार याचा विचार डोक्यात चालुच. शाळेतनं मधल्या सुट्टीतच घरी जाण्याची परवानगी मिळाल्याने आनंदाने घरी यायला निघायचे. वाढदिवसाच्या दिवशी अर्ध्या शाळेतनं घरी जायला मिळणे म्हणजे आनंदाची परमावधी. घरी पोचताच गेट धाडकन्न उघडुन घरात शिरतांना ताई घरात असल्याच्या पाउलखुणा जाणवायच्या, त्याचबरोबर यायचा तो घरी बनवलेल्या गोडसर खरपुस केकचा सुगंध. "तु पत्राला उत्तर का नाही पाठवले ?", "तु इतक्या उशिरा का आलीस ?" वैगेरे प्रश्न कुठल्या कुठे गायबलेले, स्वयंपाकघरात शिरल्यावर ताई पट्ट्कन कडेवर उचलुन घेते. मोठ्या तरसाळ्यात आधी तयार करुन ठेवलेले दोन केक ती दाखवते, तिसरा गॅसवर असतोच. "बाप्परे तीन तीन केक !!" म्हणुन माझा चेहरा फुललेला. स्वयंपाकघरात गॅसवर तवा, तव्यावर वाळु अन त्यावर ते अल्युमिनिअमचे केकचे भांडे. ताई इकडे दुधाच्या पिशवीचा कोन करुन त्यात तुपसाखर भरण्यात गर्क. आता ती केकवर त्याने लिहणार "भय्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा", छान वेलबुट्टीची नक्षी पण काढणार. मला स्वर्ग दोन बोटे उरलेला. "माय मरो मावशी उरो" म्हणतात, ताईसाठी अशी म्हण तयार नसली झालेली तरी "ताई" आणी "आई" या शब्दातच फारसा फरक नाहीच, यातच सगळे आले. तीची माया मायेसारखीच, तिला उपमाच नाही.
एव्हाना संध्याकाळ झालेली काका, मावश्या, चुलत-मामे-मावस भावंड यायली सुरुवात झालेली, त्यांच्याबरोबर घरात रंगेबिरंगी चमकीच्या कागदात गुंडाळली पुडकी पण शिरलेली. माझा आनंद आणी उत्साह शिगेला पोचलेला. मीही ठेवणीतला ड्रेस घालुन छान तयार झालेलो. शेवटचा हात ताई फिरवणारच्,थोडा तेलाचा हात डोक्यावर फिरतो, ती चापुनचोपुन माझा भांग पाडते, मी नको नको म्हणुन झटापट करत असतांनाही ती हलकासा पावडरचा पफ फिरवतेच. मी तयार. आता गल्लीतली तसेच शाळेतलीही काही मित्रमंडळीह आलेली. वाढदिवसाचा स्टँडर्ड टाईम "७ वाजता" जवळ आलेला, मी केक कापण्यासाठी उतावीळ. बाबा काका लोकांचे नावडते काम फुगे फुगवणे संपत आलेले, ताई दादातली घराची सजावट रंगेबिरंगी पट्ट्या वैगेरे पुर्ण झालेली. बच्चेकंपनीचा फुल्ल धिंगाणा चालु असतो, क्वचित एखाद्या दोघांची जुंपलेली पण असते. आता केक कापण्याचा प्रोग्राम सुरु व्हायला हवा याचा अंदाज आता मोठ्यांना पण येतो.
घरात मध्यभागी एक टेबल ठेवले जाते, त्यावर एक टेबलक्लॉथ, त्यावर छान सजवलेला केक मध्यभागी ठेवला जातो. मेणबत्ती मध्यभागी लावली जाते, "फुंकायची नाही हं" वर असेही सांगितले जाते. हॅपी बड्डे टु यु च्या मराठी गजरात केक कापला जातो, मलाही भरवला जातो. ताई लगोलग केकचे तुकडे करायला घेते. आता एकेकजण येउन "हॅपी बड्डे" म्हणुन काही ना काही गिफ्ट देउन जात असतो. लगेच उघडुन पहाणे काही शक्य नाही हे माहित असते. एक लहानगा जवळचा मित्र, राजु शेख, हातात जमा केलेली चिल्लर ठेवतो, आठवतेय तशी आजवर मिळालेली आयुष्यातली सर्वोत्तम गिफ्ट असावी ती.
बच्चेकंपनी आणी मोठेलोक पण चिवडा-लाडू-केक खाउन, फुगे घेउन घरी जातात. आता घरात सगळे जवळचे नातेवाईक. ताई दादा आणि मी आलेल्या गिफ्ट उघडुन पहाण्यात मग्न. नुसता आनंद. रात्रीची जेवणं गच्चीवर करायची ठरतात. गच्चीवर लाईट लावला जातो, ताई गच्ची झाडुन काढते, पाणी शिंपडते. गच्चीवर जेवणं पार पडतात.
एव्हाना मी झोपायळलेला असतो. काकवा-मावश्यांन्या त्यांच्या आपापल्या घरी जायचे असते, भावंड पण झोपायला आलेली असतात. देवघरासमोर रांगोळी काढुन पाट ठेवला जातो, डोक्यावर टोपी ठेवुन सगळ्याजणी मला औक्षण करतात. उदंड आयुष्याची शाश्वती तिथेच झालेली असती.
आठवणींच्या या रमलखुणा मला आजही मोहवतात, आजचाही आनंद उद्या मोहावेल, आठवणींच्या रुपाने तो शाश्वत राहील.
धन्यवाद !
शुक्रवार, १९ मार्च, २०१०
काहीबाही..
तासनतास चालणारी भेट पण काही क्षणातच भुर्र झालीये असे वाटावे. कसली ती ओढ, काय तो वेडेपणा !! तासांमागुन तास, सकाळ नंतर दुपार अन शेवटी संध्याकाळ येतेच. सातच्या आत घरातला नियम वाकवुन नउच्या आत घरात झालेला. मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'. अनेक न सुटणार्या प्रश्नांवरचा उहापोह, खरेदीची प्लॅनिंग, आईबापांबरोबरची व्युहरचना आणी भारंभार स्वप्नांच्या ओझ्याखाली दबलेला दिवस कातरवेळेबरोबर दिनवाणा होत जातो. दुचाकीही जराशी संथ आणी मिठीही तशीच .. सैलसर. तिला शेवटी उतरायचे असतेच, दिशा-रस्ता आणी सोबत ठरवुन थोडेच होते. रस्ता वळतो दिशा बदलते आणि सोबत संपते. शाश्वत आणि चिरंतन एकटेपणाला कवेत घेउन खुराड्यात शिरायचे.
----------------------------------------------------------------------------------------
सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?
----------------------------------------------------------------------------------------
उद्या उठुन लचके तोडणार्या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?
----------------------------------------------------------------------------------------
तिच्या डोळ्यातली स्वप्नं, तिचा आनंद आणि तिच्या बेमालुम झाकलेल्या जखमा.
वेड्या कविता, रेहमानची गाणी आणि निलाजरे घड्याळ.
भरुन आलेले आभाळ, हलकासा मृदगंध आणि कर्कश्य डोअरबेल.
वळणारा रस्ता, बदललेली दिशा आणि संपलेली सोबत.
----------------------------------------------------------------------------------------
सोमवार, १८ जानेवारी, २०१०
चिपाड
नारायणगाव पुणे यस्टी भस्सकन ष्ट्यांडात घुसली आणी थांबली तशी लोकं एकच घाई करुन उतरली ..
त्याला आठवले .. हो तीच ती ... किती बदलली होती. कुठे ढगळ ढगळ पंजाबी ड्रेस मधल, पाठीवरची बॅग समोर धरुन चालणारी, चापुन चोपुन बसवलेल्या लांब केसांची ती .. अन कुठे आताची. पाठीच्या खालचा बराचसा गुबगुबीत भाग दाखणारी ती जिन्स, बारबालेला शोभावा असा चमचमीत पट्टा .. अन तो टिशर्ट पाहुन तर रघ्याच ओशाळला .. थरथरत्या हाताने त्याने रसवंतीचा खटका ओढला. त्याच्या कानात घुमणारी खळ्ळ-खळ्ळ-खळ्ळ थांबली. त्याने मागे वळुन पाहिले, तिच्या कंबरेच्या पट्ट्याच्या आरश्यावरुन उन चमकले .. लख्ख्कन त्याच्या डोळ्यात. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. डोळे गच्च मिटुन त्याने चाचपडतच खिशात हात घातला. बंडलातुन एक बिडी काढुन तिचा चपटा भाग जिभेवर ठेवला आणी तित जराशे दात रुतवुन त्याने काडी ओढली. दोन झुरके घेउन त्याने परत मागे वळुन पाहिले. ती बहुदा रिक्षेची वाट पहात असावी.
मागच्या खिशात पाकिट काढायला हात घातला तो कंगवा खिशातल्या छिद्रात अडकलेला. त्याने कचकच्चुन शिवी घातली अन पाकिट जवळपास ओढुनच काढले. मागच्या वर्षीच्या क्यालेंडरखाली बोटे सारुन त्याने घडी घातलेला कागद काढला. एकवार चापपला. त्यावर ते लिहले त्याकाळी उडवलेली चमकी आता राहिली नव्हती, घड्या दबुन तो फाटायला आला होता. वर्षानुवर्षे दाबलेली इच्छा अचानक उफाळुन आली. त्याला छातीत हलकीशी थरथर जाणवली, डोळ्याखाली जडपणा जाणवला. ते पत्र द्यावे म्हणुन तो पुढे झाला तो तीच वळुन पट्ट्कन म्हणाली .. "जरा एक रस देरे .. बिनाबर्फाचा."
तिच्या आवाजातला परकेपणा त्याच्या मनात विंचवाच्या नांगीसारखा रुतला. तसेच मागे फिरुन त्याने दोन उसाची कांडकी काड्ड्कन घुडघ्यावर मोडली अन खटका ओढुन चरकात ती सारली तेच त्याची बोटे एका हिसड्याने चरकात पिळली गेली. टपाटपा रक्ताच्या धारेने रसाचे भांडे भरायला लागले होते. रघ्या ग्लानीत जातांना त्याला डॉळ्यासमोर नविन चकचकीत कागद दिसत होता, चमकी दिसत होती आणी ती दिसत होती .. ढगळ पंजाबी ड्रेसमधे, बॅग छातीशी घेउन चालणारी. तो आपल्याकडे पहातोय हे समजुन लाजणारी ..
शुक्रवार, १५ जानेवारी, २०१०
आजोबा आज्जी .. मावश्या तीन !!
घर जुने होते, मातीचे होते. आत शिरले की उबदार वाटायचे. समोरच्या खोलीत माझे आवडते पुस्तकांचे कपाट होते. आजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते, त्यांना वाचनाची आवड होती. त्या कपाटातच एक जाडजुड लाकडी रुळ होता, त्याला मात्र मी जाम घाबरत असे. मला त्यांनी कधी तो दाखवला नव्हता पण मावश्या त्याला ज्या पद्धतीने घाबरत ते पाहुन मी पण त्याला घाबरत असे. सकाळी देवपुजा झाली की आजोबा मला पाढे लिहायला बसवत, "सुट्ट्यात कसले हो पाढे ? " असे म्हटले की कधी कधी आज्जीच्या अपरोक्ष मला हळुच सुटही देत.
त्या माझ्या आजोळच्या घराच्या मागे अंगण होते. तिथे मी त्या वयात पाहिलेला सगळ्यात मोठा हौद होता. तो हौद धुवायचाही कधे मधे कार्यक्रम असे. हौदाच्या खालचे आउटलेट मोकळे करुन आजोबा सगळे पाणी सोडुन देत, मोठ्ठी धार सुटे. मला त्या वेगवान धारेशी खेळायला मौज वाटे. हौद अर्धा अधिक मोकळा झाला की आजोबा मला त्यात सोडत. त्या क्षणाची वाट मी त्या काळी अगदी प्राण कंठाशी आणुन करे. त्या पाण्यात खेळुन झाले की मग मात्र मला काम करायचे असे, आजोबा पुन्हा उरलेले पाणी सोडुन देत आणी मग मी सगळा हौद साफ करायचा असे. हौदाच्या तळाशी मउ मउ स्वच्छ वाळु सापडे. ती सगळी वाळु मी जमा करुन आज्जीकडे देत असे, घुडघा शेकायला आज्जी ती वाळु वापरे.
त्या मागच्या अंगणात हौदासमोर वेगवेगळी झाडे लावलेली होती, त्यांच्याबुंध्यापाशी नीटस आळी केलेली असत. त्या आळ्यातल्या मातीशी खेळणे, तिथे हरबरा, तीळ वैगेरे पेरणे हा माझ्या अत्यंत आवडता उद्योग होता. मी त्या आळ्यांना माझी शेती म्हणत असे. मी सकाळी उठल्या उठल्या आधी माझी शेती बघायला जाई. एकेदिवशी खरेच अगदी इवलुस्से पाते उगवुन आले होते, मला तर आभाळच ठेंगणे राहिले होते. आजोबांना माझ्या घरी पाठवुन आईला बोलावुन आणले होते. दिवसभर त्या पात्याशेजारी बसुन राहिलो होतो. त्याचा कोवळा पोपटी रंग नंतर मी कितीतरी चित्रात वापरायचो असे आई सांगते (मला काही तशी एक्झ्याक्ट शेट कालवता यायची नाही, मग आईच तसा रंग बनवुन द्यायची). दुपारभर माझे असेच काहीतरी त्या झाडांजवळ उद्योग चालायचे. मग नंतर मी ४ वाजायची वाट पहात राही. कारण ४ वाजेपर्यंत माझ्या तीनही मावश्या घरी आलेल्या असत. मग काय लाडोबाची मजा असायची. खुप हट्ट केला तर दुधाएवजी कधीतरी चहाही चाखायला मिळे (गंधाच्या वाटीत). क्रिमचे बिस्किट म्हणजे पर्वणी.
अंगणाच्या शेवटी छतावर जायला जिना होता, त्याच्या पायर्या उंच उंच असल्याने मला चढता येत नसत. मग मी, आजोबा आज्जी आणी मावश्या तीन वर छतावर जात असु. वर गेल्या गेल्या मी आज्जीच्या कडेवरुन सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असे. कारण बाजुचे मोठ्ठे लिंबाचे झाड आणी त्याच्या फांद्या अगदी माझ्या उंचीला आलेल्या दिसत. गच्चीवर लिंबाचा पाला पाचोळा असे, त्यावरुन धावतांना वाळलेली पाने पायानी चुरतांना मोठी मौज येई. माझी मजा संपते न संपते तोच मावशी खराटा घेउन गच्ची झाडायला लागे. एक मावशी बादलीभर पाणी आणुन हलकासा सडा शिंपडे, दुसरी मावशी चटई अंथरे. चुरमुर्यांना तिखट मीठ तेल लावुन आणलेले असे. गच्चीवरुन औरंगबादेतले प्रसिद्ध सलिम अली सरोवर दिसे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या गार हवेने मन प्रफुल्लीत होई. मीही खेळुन खेळुन थकायला येई. आम्ही सगळे खाली घरात यायचो. सातच्या मराठी बातम्या लागायच्या.
जेवणात माझी आवडती शेवयांची खीर असे. मी झोपायला आलो की आज्जी मला अंगाई गाउन झोपवी, काही ओळी मला अजुन ऐकु येतात,
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतंय कोण?
आजोबाआजी मावशा दोन (तीन)
गुरुवार, ३० एप्रिल, २००९
अंधार चांदण्यांचा
उत्तररात्रीनंतर किंवा पहाटेच्या आधी पोर्णिमेचा सुरेख गोलाकार चंद्र पश्चिम क्षितिजावर त्याचे अस्तित्व टिकवायला झगडत असावा.
आकाशाच्या छातीवर चित्रविचित्र आकार गोंदणारे गुढ तारकासमुह फिकट पडुन लुप्त होण्याची भिती बाळगुन असावेत, वाराही साफ पडलेला असावा. दिवसाला दिवस जोडणारा दुवा मी असाच उघड्या कोरड्या डोळ्यांनी संपवत आणलेला असावा. अन आता ते चंद्राचे पश्चिम क्षितिजावर बुडणे असह्य होत जावे...
उघड्या डोळ्यांनी सुरु व्हावा एक स्वप्नमयी भास .. कुठल्याश्या गर्द झाडीत बुडालेल्या दोन डोंगरांच्या दरीत असलेली नदी आणी तिच्या किनार्यावर कोरलेली लेणी. किनार्यावरच एका विविक्षित ठिकाणी जणु एखादी शापित अप्सराच दगडाची झाली असावी की काय इतपत सुंदर वाटणारी मुर्ती असावी. मी भारावल्यासारखा तिच्याकडे ओढला जावा, अधिरतेने तिला चुंबावा, अन फत्थरात यावी जान, मला जाणवेल न जाणवेल इतकी जाणिव होताच ती धुर बनुन वायुंडलात लुप्त व्हावी.
मी तिथेच तिला शोधत रहावा, तिथल्या निर्जिव खडकात धडका देत. भळाभळा रक्ताच्या धारा लागाव्यात, सगळीकडे होउन जावे लालच लाल .. भडक्क. धुवांधार पावसांच्या धारांनी ती दरी भरावी काठोकाठ अन लालेलाल. त्या लाल स्वप्नातुन जाग यावी कोरडी डोळ्यांनी. पुन्हा तोच बुडणारा चंद्र असावा डोळ्यासमोर अन फिकट चांदणे आकाशात पसरलेले..
चराचराला गिळुन टाकणारी खिन्नता जणु सगळ्या आसमंताला व्यापुन असावी. आपण वेड्यासारखी त्या तेजोनिधीची वाट पहावी. फिकट चांदण्यांना विझवुन बुडत्या चंद्राला बुडवुन लख्ख आसमंत प्रकाशमान होण्याची.
क्षणांना युगांची उपमा थिटी पडावी !
अस्वस्थ पणे निराशा घेरुन यावी अन सगळ्याच रात्रींना संपवणारा सुर्य नसतो असे काहीसे पटायला लागावे.
मज हे कसे उमगले
ते दु:स्वप्न नव्हते
मज चांदणे सुखाचे
केव्हा समीप नव्हते
मम भास होत राही
पुन्हा पुन्हा प्रभेचा
मम झुठ स्वप्न दावी
अंधार चांदण्यांचा
वेड्या पिश्या मनाला
आशा तशीच वेडी
उमजेल काय त्याला
हि काळरात्र आहे
गुरुवार, २६ मार्च, २००९
हरवलेलं सुख
गरम हवा (झळाया) सुटलेल्या असतात, झाडांची सळसळ अन तुरळक कुठुनतरी लांबुन येणार्या टीव्हीच्या हलक्याश्या आवाजात शांतता भरुन राहिलेली असते. अश्यावेळेस घराच्या दारांवर, खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावले जातात, त्यावर पाणी शिंपडुन त्यांच्या ओलेपणाची दुपारपुरती बेगमी केली जाते. घर सुरेख शीतल गार पडते, उन्हाच्या काहिलीने वैतागलेला जीव सुखावतो, सकाळची कामे करुन थकलेल्या आया-मावश्या जरा विसावतात. हलक्या आवाजात विविधभारती लावले जाते, हातातला पेपर अधुन मधुन वारा घेण्यासाठीही हलवला जातो. दुपारच्या जेवणात ताटात कुरडया पापड्या येतात तेव्हाच मनाला त्याची चाहुल लागलेली असते. राजासारखा तो मागावुनच येतो. केशरी पिवळसर घट्ट आमरसाने भरलेली वाटी. अगदी तुडुंब असे जेवण होते. नावापुरती शतपावली केली जाते अन वडिलधार्यांचे थोडे दुर्लक्ष झाले की सरळ गारेग्गार्र फरशीवर ताणुन दिली जाते. गाढ झोप लागते.
कपबश्यांच्या किणकिणाटाने झोप चाळवते. एव्हाना उन्हं उतरायला लागलेली असतात गल्लीतल्या पोरासोरांचा किलबिलाट सुरु झालेला असतो. चहाचा सुगंध घरात दरवळतो. गाढ झोपेने अंग अगदी जडावलेले असते, हलावे वाटत नाही. हौदातल्या थंड पाण्याने खसखसुन हात पाय तोंड धुतले जाते, अगदीच उकाडा असेल आणी वडिलधारे बाजुला कोणी नसेल तर पट्टकन बादलीभर पाणी डोक्यावर उपडे पण केले जाते. गात्रंन गात्र सुखावते. जडपणा कुठेल्या कुठे वाहुन जातो. "चल येउन बस इकडे, मी पुसते डोके तुझे !!" असे म्हणताच आज्जीच्या पायाशी बसले जाते. ती खसखसुन डोके पुसतांना वाफाळलेला चहा एकेक घोट करुन अंगात चैतन्य वहावत असतो.
उन्हं पुरती कलल्यावर झाडांना पाणी घालण्याचा कार्यक्रम ठरलेला. आधी मोठी झाडं, मग गच्चीवरच्या कुंड्या. दुपारच्या कडक उन्हात तापलेली माती पाणी पडताच मायेने ओथंबते, हलकासा मृदगंधही जाणवतो. छातीभरभरुन वास घेण्याचा प्रयत्न केला तरी मन भरत नाही. पाउसही लवकरच येणार आहे असे मनाला समजवले जाते, ते तात्पुरते. सगळी झाडं संपल्यावर गच्चीवर आणी अंगणात सडा टाकला जातो. भराभर पाणी सुकुन जाते. त्यांच संध्याकाळचं दुध पिउन झालं की उन्हं उतरल्यामुळे मुलांना बाहेर खेळायची परवानगी मिळते. रांगोळी शिकणार्या चिल्ल्यापिल्ल्या सडा टाकलेल्या स्वच्छ अंगणात हात आजमाउन घेतात अन मुले काहीबाही खेळ खेळतात. अगदी किलबिलाट चालु असतो !! टीण्ण टीण्ण अशी घंटी वाजवत एखादा मटका कुल्फी वाला आलेला असतो, परवाच तर खाल्ली होतेस ना अशी सबब मिळुन कुल्फीला नाही म्हणायचा मोठ्याकडुन प्रयत्न होतो पण बच्चे कंपनी ऐकत नाही, दोन वाली किंवा तीन वाली अशी करुन सगळ्यांसाठी एकेक कुल्फी घेतली जाते. कुल्फीवाला माठात हात घालुन अॅल्युमिनिअमच्या कुल्फी कॅन काढतो. वरचे रबरी बुच काढुन तित काडी खोचुन दोन्ही पंजांच्या मधे सरासर फिरवतो अन झटकन काढुन समोरच्या मुलाच्या हातात देतो, मुल चराचराला विसरलेले असते !!
सुर्य कलतो, तिन्हीसांजा होतात. कातरवेळेचं भान राहु नये म्हणुन देवापुढे दिवा लावला जातो, खेळणारी लहानगी शहाणी बनुन पर्वचा म्हणतात. सातच्या बातम्या सगळ्यांनी मिळुन पाहिल्या जातात. रात्रीची जेवणं झाली की गच्चीवर अंथरुणं टाकली जातात. चंद्रप्रकाशात मोठ्यांच्या गप्पांना अन मुलांच्या दंग्याला उत येतो. शेवटी त्यांना शांत बसवायला हवे म्हणुन आजोबा एखादी छानशी शिवरायांची गोष्ट सांगायला घेतात, चांदण्या बघत - कुतुहलाने गोष्ट ऐकत एकेक पोर शांत झोपी जाते. हळुहळु मोठी माणसं पण पाठ टेकवतात.
चंद्रप्रकाशात न्हायलेलं माझं गावही एव्हाना शांत झालेलं असतं, घर अन घर सुखाने निर्धास्त झोपी जाते.
या लेखाला मिसळपाव डॉट कॉम वर मिळालेले प्रतिसाद पहा.