शनिवार, १६ ऑगस्ट, २००८

लोकायतची मुहुर्तमेढ .. !!




नमस्कार,

आज तुम्हाला या ब्लॉगद्वारे मराठीतील एका नव्या संकेतस्थळाबद्दल माहिती देतांना आनंद होत आहे. १५ ऑगस्ट २००८ ह्या भारताच्या ६१ व्या स्वातंत्रदिनापासून मराठीत लोकायत डॉट कॉम ( http://www.lokayat.com/ ) नावाचे एक नवे संकेतस्थळ सुरू झाले आहे.

लोकायत.कॉम ओळख


या संकेतस्थळाचा मुख्य हेतू इंटरनेटवर संगणकावर मराठीच्या वापरास चालना देणे हा आहे. येथे साध्या सोप्या मराठीतून संगणक व इंटरनेटच्या वापराबद्दल मार्गदर्शक लेख, नवनवीन तंत्रांची मराठीतून ओळख तसेच आपल्या संगणक व इंटरनेटबद्दलच्या अडचणींबद्दल तज्ज्ञांना प्रश्न विचारण्याच्या सोई उपलब्ध आहेत/ उपलब्ध करुन् देण्याचा मानस् आहे.

मराठीचा वापर इंटरनेटवर वाढावा यासाठी अनेक लोक काम करीत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल माहिती, त्यांचे प्रकल्प आदींबाबत सविस्तर वृतांत येथे देण्यात येतील. तसेच मराठी फ्रीलांसर्सची सूची येथे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
या संकेतस्थळावर अत्यंत सोप्या पध्दतीने मराठी लिहीता येते. त्यासाठी वेगळं मराठी टायपींग शिकण्याची गरज नाही. त्यामुळे दहा मिनीटातच आपण या मराठी संकेतस्थळावर सहज होतो आणि लिहू लागतो.


येथे या आणि सदस्य व्हा. एक साधा अर्ज भरून सदस्य होता येते. वाचण्या करिता सदस्य होणे गरजेचे नाही मात्र लेख लिहीण्यासाठी तसेच प्रश्न विचारण्यासाठी मात्र सदस्य होणे गरजेचे आहे.


तुम्ही सुद्धा या प्रकल्पात सामील व्हा. सदस्य व्हा. तुमच्या आवडीच्या तंत्रज्ञानासंबधी लेख लिहा. प्रश्न विचारा, इतरांच्या शंकांना उत्तरे द्या.


तुमचे सहर्ष स्वागत.

धन्यवाद.

-आपलाच आनंदयात्री

लोकांकडून-लोकांसाठी...लोकायत!

उपक्रमावरील लोकायत बद्दलची चर्चा

मंगळवार, १२ ऑगस्ट, २००८

अंकुर

अंधारलेल्या भल्या पहाटे आपल्या गावाने ओलेत्यानेच आपले स्वागत करावं. दाराशी पोचल्या पोचल्या पोचल्या तोच पारिजताकाचा शुभ्र सडा दारी अंथरलेला असावा. अंगणातलं झाडंन झाड ओळखीच हसावं. पावसानं ओलीचिंब ती, माझ्या अंगणातली झाडं, जणु अपार माया निथळत असावीत. घर आल्याची आश्वस्त जाणीव क्लांत मनाला निववुन जावी, इतक्यात सकाळची नांदी देणारी कोकिळेची 'कूहssकूहssss' अशी हाक आसमंतात घुमावी अन टप्पकन एक टपोरा गारेग्गार पाण्याचा थेंब अगदी अचुक कपाळावर पडावा. आशिर्वाद देणारा !



या अश्या निव्वळ सुखाला विषण्ण विलक्षण छेद देउन जाणारा अव्यक्त सल खस्स्कन काळजात रुतावा, सय दाटुन यावी, अन मग असेच बरेच काही, भळाभळा वहाणारे वहात रहावे, तिथेच उभ्या उभ्याच. मनात दाबुन ठेवलेली ती वेदना अशी जर्राशी फट मिळताच उसळुन बाहेर यावी, चुका शोधुन शोधुन आठवल्या जाव्यात, खपल्या उकरल्या जाव्यात. मग चालु रहावे द्वंद्व अशाच विचारांचे अन खोटारड्या वांझोट्या स्वप्नांचे. स्वागत करणारे हसरे घर आता हिरमुसले वाटायला लागते, त्याला आपला केवडा हवा असतो,त्यासाठी त्याचे आक्रंदन अन केवड्याच्या मनात काही वेगळेच. अशी का बरे दर आनंदाच्या क्षणाला तुझी आठवण यावी ? का जाणवावी हलकीशी थरथर ? का बरे व्हावा आवाज कातर ?



एव्हाना बरिचशी फुले मी ओंजळीत जमा केलेली असतात अन समोर सुहास्य वदनाने ती वात्सल्यमुर्ती उभी असते, आई ! तिच्या हातातल्या दुरडीत खुप सारी रंगेबीरंगी फुले असतात, काही फुलांना काटेही असतात अन काही मंजुळाही असतात. माझीही ओंजळ हलकेच त्या दुरडीत रिती होते, त्या फुलांमधे आता माझ्या ओंजळीतली फुलंही सामावलेली असतात. मी हलकेच तिच्या पायाशी वाकतो, डोक्यावरुन तिचा आश्वस्त हात फिरतो अन फुलाचा झाडाच्या दिशेने एक अनोखा प्रवास सुरु होतो. आकाशात तांबडे फुटलेले असते अन आताशाच रुजवलेल्या एका बीजालाही एक छोटा हिरवा अंकुर फुटलेला असतो.



शुक्रवार, ४ जुलै, २००८

भुंगा




अजाण भुंगा एका दिवशी
बागेमध्ये भ्रमरत होता
नाजुक सुंदर फुले आगळी
अन थोडिशी कोळी जाळी

अल्लड सावज अवचित आले
भराभरा ते जाळे विणले
कोळी वदला फुला आपला
स्नेह निराळा सख्य निराळे

त्या वेड्याला पाहुन पटकन
फुलानेच एक जाळे विणले
होता कोळी हरकामी तो
भराभरा तो डाव मांडला

उधळुन देता परागसुमने
भुंगा वेडा धावत आला
भुंगा वेडा असाच होता
आप्तांपासुन दुरावलेला

दिसता कोमल फुल आगळे
वेडा भुंगा मोहित झाला
झेप घेउनी मर्म स्थळावर
गुज फुलाचे ऐकत बसला

फुलही वदले शोककथा ते
अनाघ्रात मी सुंदर होते
पण जगाची तर्‍हाच न्यारी
कुस्करले अन गचाळ म्हटले

कोळ्याने मज घात हा कला
सभोवती हे जाळे विणले
तुच आगळा माझ्यासाठी
पटकन उडला सत्वर आला

वेडा भुंगा ऐकत बसला
दु:खी झाला कष्टी झाला
कोळ्याने तो करता इशारा
फुल लागले पंख मिटाया

समजुन कावा भुंगा वेडा
यत्न निसटण्या करु लागला
फुल म्हणाले वेड्या भुंग्या
कावा तुज का नाही उमगला

ये आता ये शोषुन घे मग
मधुरस पाहिजे हवा तेवढा
खजिल भुंगा शेवटचा तो
प्रणय करण्यास अधिर झाला

दुज्या सकाळी रविकिरणांनी
फुलास नाजुक पुन्हा उठवले
निसटुन गेले कलेवर काळे
अनायसे ते जाळ्यात पडले.
..


बुधवार, २ जुलै, २००८

कावळा

आटपाट नगरात एक गरीब कष्टकरी कुटुंब रहात असते. ३ मुलं आणी त्यांचे आई बाबा. आई वडील दोघेही मजुर आणी कुटुंबाचे बस्तान एका लहानग्या झोपडी मधे.एका वर्षी प्रचंड असा दुष्काळ पडतो. ते गरीब कुटुंब अन्नाला महाग होते. घरात असलेले किडुक मिडुक विकुन कसातरी आला दिवस ढकलने चालु असते. हळुहळु परिस्थिती अजुनच बिकट होते. मुले लहान असतात, त्यांचे पोट भरावे म्हणुन ते दोघे अर्धपोटी रहायला सुरुवात होते. नवरा एक दिवस रोजच्या त्रासाला कंटाळुन तिरीमिरीत घर सोडुन परगांदा होतो. आई ला धीर सोडुन चालणार नसते, ती लेकरांना कशी सोडून जाणार, ती कंबर कसते आणी कसेबसे आपल्या लहानग्यांचे पोट भरायला सुरुवात करते. पण दिवस अजुनच वाईट येतात. कुटुंबाची अन्नान्न दशा होते. रोजच्या उपासमारीने एकादिवशी बिचारी दगावते.

आता घरात ३ मुले. मोठा जेमतेम ५ वर्षांचा मधला ३ वर्षांचा आणी लहानगा फ़क्त १ वर्षांचा. आई बोलत का नाही, नुसती झोपुनच का आहे या विचाराने भांबावलेले पोरं अन रड रड रडणारा सगळ्यात लहाना छोटु. यथावकाश ४ लोक जमा होतात अन त्या मुलांच्या आईचे क्रियाकर्म उरकले जाते. नंतरचे दिवस खरे परीक्षेचे असतात. लेकरांचे अगदी हालहाल होत्तात. दहाव्या दिवशी कुठुन तरी मुलांचा मामा येतो आणी येतांना बांधुन मुठ्भर तांदुळ आणतो. मुले आनंदतात, त्याना वाटते आज मामा आला आज चांगले जेवायमला मिळनार. पण मामा सांगतो बाळानो आज आईचा १० वा दिवस आधी गंगेवर जायला हवे.

मुले बिचारी २ दिवसांची भुकेली तशीच मामा बरोबर गंगेवर जातात. मामाने भाताचा पिंड करुन कावळा शिवायसाठी ठेवलेला. सगळ्यात लहाना भुकेने पार व्याकुळ झालेला. मोठा मुलगा म्हणतो मामा अरे थोडा भात दे ना छोटुला. तर मामा म्हणतो बेटा आधी कावळा शिवुदे पिंडाला. बराच वेळ होतो कावळा काही पिंडाला शिवत नव्हता, इकडे पोरं भुकेनी अगदी व्याकुळ झालेली.

बराच वेळ होतो लहाना रडुन रडुन अगदी अर्धमेला होतो. अजुन एकदा लहाना असेल नसेल त्या ताकदीने जोरात रडायला सुरुवात करतो आणी तोंडातुन फेस येउन आचके देउन बेशुद्ध पडायला येतो. मोठया मुलाला रहावत नाही, त्याला काय होते ते समजतही नसते त्याला फक्त त्याच्या पोटातला आगडोंब छोटुच्या पोटात पण आहे एवढेच समजत असते. तो मामाचा हात झिडकारतो अन पळत जाउन त्या पिंडामधला एक घास भात छोटुला भरवतो. पुढच्याच क्षणी झर्रकन झेप घेउन एक कावळा त्या उरलेल्या पिंडाला शिवतो.

नोंदः लेखन इतरत्र पुर्वप्रकाशित.

या लेखाला मिसळपाव डॉट कॉम वर मिळालेले प्रतिसाद पहा.

बुधवार, ४ जून, २००८

हा भास म्हणु की....

"सर, टु हिंजवडी ऑर टु कोथरुड फस्ट ?"

असे ड्रायव्हरने विचारताच मांडीवरचा ल्यापटॉप बाजुला ठेउन त्याने समोर नजर टाकली, जवळ जवळ येणारा वाकडचा फ्लायओव्हर ओळखीचा वाटला पण आजुबाजुचा भाग मात्र आधी होता तसा मोकळा मोकळा अजिबात राहिला नव्हता. चकचकीत इमारती अन सुसाट जाणार्‍या गाड्या त्या फ्लायओव्हरची ओळख पुसट करत होत्या. विसएक वर्षात पुणे बरेच बदलले होते.

"लेट्स हॅव ब्रेकफास्ट इन कोथरुड फस्ट !", तो कोरडेपणे उत्तरला. गाडी उजवीकडे न वळता सरळ चांदणी चौकाकडे धावायला लागली.

त्याची भिरभिरती नजर आजुबाजुच्या परिसरात ओळखीच्या खुणा शोधत होती,

हा भास म्हणु की आहे तुझाच गाव ..
बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव ..

तो गुणगुणला. डाव्या बाजुला बरेचसे ओळखीचे एक तळे अन त्यासमोरचे शिवमंदिर दिसले, हो बहुदा शिवमंदिरच होते ते, आणी तेच मंदिर होते ते. ऑफिसमधुन घरी जातांना हमखास गाडी वळायची त्यांची तिकडे. गारेग्गार एसी मधल्या मुर्दाड हवेपेक्षा तळ्याकाठच्या बाकावरचा तो उधाण मोकळा वारा त्यांना मोहवायचा. दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी अगदी "आज चहा मेला अगदीच फुळ्ळुक होता" पासुन ते अप्राईजल मीटींगमधे बॉस्स ने कसे पिडले इथपर्यंतच्या गुजगोष्टी बहरायच्या. किती सांगु किती नको असे व्हायचे तिला, चिवचिवाट एकुन आजुबाजुची रोज भेटणारी एकदोन म्हातारी खोडं गालातल्या गालात हसायची अन हळुच तिच्या डोक्यावर टपली मारुन तिला भानावर आणायची. प्रमोशनच्या खुशीपासुन ते तिच्या आईने दिलेल्या होकारापर्यंतचे जवळपास सगळे आनंद त्या शिवशंभोच्या साक्षीने साजरे व्हायचे.

आभास असे की जीव खुळावुन जाई..
मन बासरी होवुनी तुझीच गीते गाई..

त्याकाळातली त्यांची ती छोटीमोठी स्वप्ने त्या नंदीला आठवत असतील का ? रोज तिला बबडी म्हणुन हाक मारणारा म्हातारा नंतर कितीतरी दिवस आपल्याला शोधत असेल ! अन मग एका क्षणात वेदनेचा चित्रपट झरझर त्याच्या डोळ्यासमोरुन निघुन गेला.

दुपारी २ वाजता हलका लंच करुन ठरलेल्या शेड्युल प्रमाणे तो मीटिंग रुम कडे वळाला. काही क्षणातच टकटक वाजवुन दार उघडले गेले. पुर्णतः बिझनेस फॉर्मल्स मधली एक साधारण चाळीशीची स्त्री लगबगीने आत शिरली. थक्क होउन तो पहातच राहिला. उठुन अभिवादन वैगेरे करायचे सगळे एटिकेट्स विसरुन तो अवाक होउन बघत होता.

वादळात हलते झुम्बर दाही दिशांचे..
ये पाउस होवुनी झिरपत आर्त मनाचे..

अंगातले ब्लेझर बाजुला टाकुन त्याने कारचे दार ओढुन घेतले अन काच खाली केली, ती लांबुन हात हलवुन त्याला बाय म्हणाली असावी, यांत्रिकपणे त्याचा हात हलला. टायची क्नॉट थोडी मोकळी करुन त्याने डोके मागे टेकवले अन डोळे मिटुन जरासा विसावला. थोड्या वेळाने त्याने मागे वळुन बघितले, वाकडचा फ्लायओव्हर मागे पडला होता अन धुराळा उडवत त्याची गाडी पुन्हा मुंबईकडे धावु लागली होती.

वार्‍यावर अवचित उठे धुळीचा लोट..
अन हरवुन जाई तुझ्या गावची वाट..
हा भास म्हणु की आहे तुझाच गाव ..
बघ श्वासही घेती माझे तुझेच नाव ..


(वरील लेखात उल्लेखलेल्या काव्यपंक्ती फुलवा यांच्या एका कवितेतील आहेत.)
या लेखाला मिसळपाववर मिळालेले प्रतिसाद पहा.

शुक्रवार, १६ मे, २००८

उन पाउस

कधीतरी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी कथेचा हा स्वैर अनुवाद ...

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनं निघालेली एक्सप्रेस यथावकाश मुंबईचा कोलाहल सोडुन सह्याद्रीच्या कुशीत शिरली. गार मोकळ्या वार्‍याने प्रवासी छान सुखावले, कुणी मासिकं-वर्तमानपत्र वाचु लागले तर कुणी बसल्या बसल्या पेंगु लागले. गाडी अगदी सगळ्या प्रकारचे-वयाचे लोक पोटात घेउन धावत होती, तरीही बहुतांश प्रवासी नोकरदार वर्ग किंवा महाविद्यालयीन तरुण तरुणी होते.

त्या कंपार्टमेंटमधे खिडकीजवळ साधारण साठीचा एक शिडशिडीत वयस्क गृहस्थ त्याच्या जवळपास तिशीच्या मुलाबरोबर बसला होता. म्हातारा मोठा टापटिप होता, चेक्स चा हाफ शर्ट व्यवस्थित ईन केलेला डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा वयाला साजेसा संथपणा असा मोठा ऐटीत बसला होता. पोरगा मजेत पण किंचीत बालिश नवथरपणे खिडकीतुन बाहेर बघत बसला होता.

पावसाळ्याचे दिवस होते. जशी गाडी लोणावळा-खंडाळा परिसराच्या नयनरम्य निसर्गाने नटलेल्या परिसरातुन जाउ लागली तसा त्या तिशीच्या पोराचा उत्साह ओसंडुन वाहु लागला, डोंगर दर्‍या, जागोजागी वहाणारे लहान मोठे धबधबे अन निसर्गाची हिरवीकंच दौलत पाहुन तो हरखुन मोहरुन गेला.

"बाबा .. ओ बाबा .. ऐका ना .. ते काय हातात धरुन बघताय तुम्ही .. इकडे बघा ! .. ही कशी झाडं सगळी मागे पळतात बघा ना ! हिरवा रंग किती सुंदर आहे नं .. अस वाट्टय इथच खाली उतरुन नुसते हे डोंगर दर्‍या बघत बसावेत ... नाही ?"
हे ऐकता ऐकता बाप सुद्धा हातातला पेपर ठेवुन, पोराबरोबर बाहेरची सिनरी पहाण्यात रमला.

आजुबाजुच्या लोकांना त्याचे असे वागणे विचित्र वाटायला लागले. प्रत्येकजण चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहुन आपल्या बरोबरच्या सहप्रवास्याबरोबर त्याच्याबद्दल काही ना काही खुसफुसत बोलायला लागला.

"हा येडा दिसतोय !" समोरच बसलेला अनुप त्याच्या नववधुला म्हणाला.

इतक्यात पावसाला सुरुवात झाली अन पावसाचे तुषार आत बसलेल्या प्रवास्यांवर खिडकीतुन पडायला लागले. थोडे उन थोडा पाउस असे मोठे विहंगम दृष्य पाहुन तिशीच्या पोराच्या आनंदाला पारावार उरला नाही, ताठ होउन भान विसरुन तो पावसाला पहात होता. अत्यानंदाने त्याने दोन्ही हातांनी गजांना घट्ट धरुन ठेवले होते. भावनातिरेकाने तो शहारला, त्याच्या हातावरची लव उभी राहिली, त्यावरच्या चकाकणार्‍या पाण्याच्या थेंबांचे डवरुन उठलेले मोती पहावे का बाहेर सुर्यास्त होतांना ढगांच्या कडांवर विसावलेले इंद्रधनुष्य पहावे अश्या विचारात तो बेभानपणे आलटुन पालटुन दोन्ही दृष्य नजरेत साठवुन घेत होता.

इकडे अनुपची वधु तिचा नवा ड्रेस पावसाच्या थेंबांनी खराब होत होता म्हणुन वैतागली होती. तिने एक रागिट कटाक्ष अनुपकडे टाकला.

अनुप शेवटी वैतागुन म्हणाला,"अहो काका, पाउस पडतोय हे दिसत नाही का तुम्हाला ? तुमच्या मुलाला बरे वाटत नसेल तर त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलात नेउन टाका ना ! प्लिज अजुन त्रास नका देउ आम्हाला !"

म्हातारा थोडासा पुढे झुकला अन हळु आवाजात म्हणाला,

"श्श्श .. ! "
"आत्त्ता आम्ही हॉस्पिटल मधुनच परत येतोय, माझ्या मुलाला सकाळीच डिस्चार्ज मिळालाय, तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा."

तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.




हे लिखाण मिसळपाव वर पुर्वप्रसिद्ध.
या लेखाला मिसळपाव वर मिळालेले प्रतिसाद पहा.

बुधवार, १६ एप्रिल, २००८

आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे ..




तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु.


तुला आठवतो का ग आपला एखादा प्रवास ? मला खिडकीचीच जागा हवी म्हणुन हट्ट असायचा तुझा, अन जागा मिळाल्यावर काय तो ओसंडुन वहाणारा आनंद. गाडी हलली - जssरा गार वारा लागला की बोलता बोलता आपसुक डोळे मिटायचे तुझे आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे. खाचखळग्यात झटका बसुन तुझे डोके पुढे आदळु नये म्हणुन दुसर्‍या हाताने मी तुझ्या हनुवटीला अलगद आधार देउन ठेवायचो. भुरभुर उडणारे तुझे केस माझ्या कानाला, गालांना गुदगुल्या करायचे आणी मग शेवटी न रहावुन मी त्यांना सावरायचा प्रयत्न करायचो, या सगळ्यात तुझा डोळा उघडायचा आणी मग तु मला रागे भरायचीस,


"काय रे! दोन मिनीटे काही जिवाला शांत बसु देणार नाहीस, आत्ता कुठे थोडा डोळा लागला होता तर ...".असं थोडं काही मनाविरुद्ध झालं की लगेच रुसायचीस तु, गाल फुगवुन बसायचीस आणी दोन मिनीटात बाहेरची गम्मत जम्मत पाहण्यात रमुन पण जायचीस. माझ्या हाताला लागलेली कळ कधी लक्षात आली होती का ग तुझ्या ?



हा आणी असेच कितीतरी प्रश्न अनुत्तरीत ठेवुन गेलीस तु, अशाच एका एका प्रवासात अलविदा म्हणालीस अन नव्या प्रवासाला निघुन गेलीस नव्या दिशेला. तुझा तो अलविदा कळायला मला जरा उशीरच झाला. माझा तर प्रवासच खुंटावला आणी दिशा पण हरवल्या, जसा झोकात उडणारा एखादा कलमी पतंग अचानक कामटी मोडुन सरळ उलटा खाली यावा अन एखाद्या विजेच्या खांबावर कायमचा अडकुन पडावा, पतंग उडवणार्‍या हिरमुसल्या पोराने हताशपणे नुसताच दोरा ओढुन घ्यावा.



आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे
दुनिया ने फिर न पूछा, लूटा है मुझको कैसे
न किसी का साथ है, न किसी का संग
मेरी ज़िंदगी है क्या.............